रविवार, १५ जानेवारी, २०१२

तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला..





तीळ स्नेहाचे प्रतीक सुंदर,गोडी गुळाची त्यास मिळे जर,
स्नेहभाव हा वाढविण्याला,तिळगुळ देणे निमित्त खरोखर!
हे मकरसंक्रमण तुमच्या आयुष्यात चांगले बदल आणो.                                    

सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

महाश्वेता !!



रविवार सकाळ...मस्त सुट्टीचा दिवस... सहज माझा laptop चाळत बसलोय.
अचानक काही जुन्या कवितांचे व्हिडीवो सापडले.त्यातला एक व्हिडीवो माझ्या खूपच आवडीचा..
"भय इथले संपत नाही"... सही.. लता दिदींनी काय गायलीय हि कविता.. फारच अप्रतिम..
कवी ग्रेस यांची कविता... लातादिंचा आवाज... हृद्यनाथांचे संगीत... 
काय अजब रसायन आहे ते.. हे शब्द कधीहि कानावर पडले तरी मन एका वेगळ्याच तंद्रीत बुडून जाते...

हि कविता पहिल्यांदा मी ऐकली,पाहिली  तीमहाश्वेता” या टिव्ही सिरीयल मध्ये... 
आता नक्की आठवतनाही पण अंदाजे आठवी-नववीत असेन मी तेव्हा. काय जादू होती त्या आवाजात आणि संगीतात कोण जाणे.नंतर ती सिरीयल पाहणे म्हणजे दररोज चा एक उपक्रम झाला.
सिरीयल पाहण्याचा हेतू एवढाच कि ती कविता ऐकायची. पण हळूहळू ती सिरीयल पण आवडायला लागली. सौंदर्य आणि अभिनय संपन्न ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांची अदाकारी काय अप्रतिम होती.

एका गरीब घरातील मुलगी... आपले आई वडील आणि  दोन बहिणीसोबत राहणारी.सुसंस्कृत पण गरीब कुटुंबात वाढलेली. अचानक एका गर्भश्रीमंत मुलाच्या नजरेत भरते. ती त्याला खूपच आवडू लागते. तो तिच्या वर प्रेम करू लागतो.आणि एक दिवस तो तिला लग्नाची मागणी सुद्धा  घालतोहे सगळे इतक्या नकळत पणे घडतं कि तिच्या साठी हे सगळे म्हणजे सिंड्रेलाच्या गोष्टी सारखं... अचानक आयुष्यात आलेल्या या वादळाने बावरलेली,पण मनातून आनंदित झालेली मुलगी ऐश्वर्याने अप्रतिम साकारली. बऱ्याच महत प्रयासाने त्या दोघांचे लग्न होते. सगळे स्वप्नातल्या सारखे,प्रत्येक गोष्ट तिच्या साठी नवीन. दिवस कसे आनंदात जात असतात.

आणि अचानक एक दिवस एक मोठा प्रश्न सर्व समोर तिच्या समोर वासून उभा ठाकतो
सुमती शेत्रमाडे यांच्या "महाश्वेता" या कादंबरी वर आधारलेली हि सिरीयल एका विचित्र वळणावर येऊन ठेपते. ‘अनुपमा’ म्हणजे ऐश्वर्या नारकरला कोडाचा असाध्य आजार झालाय हे तिच्या लक्ष्यात येते. तिच्यावर मनापासून प्रेम करणारा तिच्या पती मात्र अचानक आलेल्या या प्रसंगाने पूर्ण बदलून जातो.तो तिच्यावर हि कोडाची गोष्ट लपवल्याचा संशय घेतो. आणि मग अनुपमाची एक नवी लढाई सुरु होते समाजाच्या मानसिकतेविरुद्धत्याकाळी कोड होणे म्हणजे भारतीय समाजात एक शाप समजला जायचा.

जीवनातल्या वेगवेगळ्या कडू गोड प्रसंगातून जाणारी हि मालिका,त्या वेळी फारशी समजतही  
नव्हती आणि ती समजून घ्यायची तेव्हा इच्छा हि नव्हती. फक्त आवडायची ती त्या मालिकेतली पात्र आणि तिचे टायटल साँग. मालिका संपली पण कवितेच्या पंक्ती मात्र कायमच्या मनात राहून गेल्या.. 

पुढे पुण्यात आल्यावर एकदा पंडित हृदयनाथांचा कार्यक्रम पाहण्याची संधी चालून आलीत्यांनी जेव्हा हे गाणे गायले तेव्हा अचानक सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
मग आमचे परम मित्र, गूगल आण्णा यांच्या मदतीन या कवितेचा व्हिडीवो मिळाला.. तेव्हा आपल्या लहानपणीचे काही क्षण परत मिळाल्याचा आनंद झाला. आज इतकी वर्ष होऊन गेली पण हे गाणे ऐकताना तोच आनंद अजूनही मिळतो... 

महाश्वेताच्या टायटल साँगमध्ये मूळ कवितेतली फक्त  चार कडवी आहेत
तुमच्या सर्वासाठी सगळी म्हणजे आठही कडवी इथे देत आहे..
मी हे आता लिहितोय, बाहेर मस्त ऊन पडलंय, मनात जुन्या आठवणी आहेत आणि कानावर लातादिंचे मंजुळ स्वर  "भय इथले संपत नाहीची आवर्तन करतायत...
Simply Awesome…
                             
                                                                                                      -- मेघमल्हार...



भय इथले संपत नाही....!!
भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई...!!

                                                       --ग्रेस